श्रीमंत निसर्गातील गरीब गाव

                                         

वर्षभर पोटासाठी स्थलांतर करणाऱ्या अभयारण्यातल्या एका अतिदुर्गम खेड्यातील आदिवासी जगतात कसे ? त्यांचे प्रश्न कोणते आहेत ? त्या खेड्यात जाऊन लिहिलेला हा हेरंब कुलकर्णी यांचा लेख  सकाळ च्या सप्तरंग पुरवणीत प्रसिद्ध झाला आहे.         
                    
                     श्रीमंत’ निसर्गातील ‘गरीब’ गाव...

निसर्गाचे इतके भरभरून देणे असताना, श्रीमंत जंगलसंपत्ती असलेले हे गरीब गाव. प्रशासनाच्या आणि कायद्यांच्या कात्रीतले हे कमनशिबी कुमशेत. या निसर्गाचा भाग असलेली ही आदिम माणसे. वेग पकडलेल्या आमच्या जगण्यासोबत कधी येतील ? आम्ही बुलेट ट्रेन चालवताना अजून रस्त्यासाठी झगडताहेत आम्ही एअर अम्ब्युलन्स ने पेशंट नेताना ते झोळीत पेशंट आणताहेत आम्ही चायनीज खाताना ते कोरडा भात खाताहेत आणि आम्ही जगभर विमानाने रोजगारासाठी फिरताना हे सारे गाव निमुटपणे ३०० रुपयासाठी खाली मान घालून १२ तास राबते आहे ..तुमच्या माझ्या जगाच आणि या कमनशिबी दुर्गम अभयारण्यातल्या या माणसातील अंतर कसे सांधायचे हीच खरी चिंता आहे ..भारत आणि इंडिया म्हणतात तो हाच ना  ??


              या लेखमालिकेच्या निमित्ताने दुर्गम आदिवासी खेड्यात जाऊन तिथले जगणे बघावेसे वाटले. कळसुबाई, हरिश्चंद्रगड यामुळे प्रसिद्ध असलेल्या अकोले या आदिवासी तालुक्यातील अतिदुर्गम अशा कुमशेत या आदिवासी खेड्यात पोहोचलो. सोबत लेखक शांताराम गजे व या गावाची माहिती असलेले निसर्गप्रेमी रमाकांत डेरे यांना घेतले. तालुक्याच्या गावापासून उंचावर ६५ किलोमीटर हे गाव.जिल्ह्याच्या मुख्यालयापासून हे गाव १९० किलोमीटर दूर आहे. यातच त्याची दुर्गमता लक्षात यावी. कडेला खोल दऱ्या आणि टेकडीवर वसलेले हे गाव. गाव हे अभयारण्यात वसलेले. कडेला जंगल आणि श्वापदे त्यात जगणारी माणसे कशी जगतात हे बघायचे होते. निसर्गाचे भरभरून देण लाभलेले हे गाव पण या निसर्गसुंदर गावातील गरीब माणसांची वेदना बघून तिथल्या निसर्गाचा मनमुराद आनद घेता येत नाही, त्या आनंदाला या माणसांच्या वेदनेची किनार आहे.

            गाव अगदी छोटे. सगळी वस्ती आदिवासी जमातीची. ११६६ लोकवस्तीचे गाव .त्यातही गावाला ६ वाड्या. गावात २२२ कुटुंबे. गावाचे एकूण क्षेत्र ७००० एकर त्यात ६००० एकर हे वनक्षेत्र आणि उरलेल्या १००० एकर क्षेत्रात गाव आणि गावाची शेती. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला सरासरी २ ते ३ एकर शेती येते आणि तीही खडकाळ. इतक्या कमी जमीन असताना हे लोक कसे जगतात ? हे बघायचे होते. इतक्या कमी क्षेत्रात फक्त भात लागवड. अपवादाने काहीजण गहू करतात. वरई नागली करण्याचे प्रमाणही कमी.अतिपाउस व तीव्र हवामानामुळे उतार पिके व फळबाग लागवड करणे कठीण.आंबा लावला तर वाळवी लागते. आवळा वाढत नाही. त्यातून फक्त भात हेच उत्पन्न. किती भात होतो ? हे विचारलं तर २ ते ३ पोते तांदूळ हातात येतो. इतका तांदूळ केवळ घरात खाण्यासाठीच वापरला जातो. त्यामुळे शेतीतून जगण्यासाठी उत्पन्न काहीच नाही अशी स्थिती आहे.पुन्हा अभयारण्य असल्याने वन्यपशू शेतीची नुकसान करतात. ती नुकसान सतत होत राहते. वनखाते खूप कडक वागते. जंगलात येऊ देत नाही. जनावरे चारू देत नाही.. घरात फारसे धान्य डाळी भाजी ही नसते. एक दोन घरात महिलांना काय स्वयंपाक केला विचारले ? तर भात व कोरडी भेंडीची भाजी केली होती. भात त्या कोरड्या भाजीसोबत खात होत्या. अशा गावात लहान मुले कोमेजलेली होती.त्या मुलांना खाण्यासाठी काय वेगळे मिळणार होते ? रोजगार व उत्पन्न नसलेल्या या गावात एकतर  रोजगार हमी किंवा गाव सोडून मजुरीला जाणे एवढे दोनच मार्ग आहेत.


             अशा रोजगाराची स्थिती काय ? हे जाणून घ्यायचे होते. गावाच्या एका वाडीत ग्रामसभा सुरु असल्याचे कळले.आम्ही ती वाडी शोधत गेलो. वाडीतील मंदिरात सगळे गावकरी जमले होते.वनहक्काच्या दाव्यांच्या संदर्भात ग्रामसभा सुरु होती. देशाच्या एका अतिदुर्गम गावात ग्रामसभेत होत असलेली चर्चा आणि होणारे निर्णय बघणे हे लोभसवाणे होते. सभा संपल्यावर   सरपंच आणि ग्रामसेवक आणि गावकरी भेटले. त्यांना रोजगाराविषयी छेडले. दोन वर्षापूर्वी रोजगार हमीची ३५ ते ४० दिवस कामे चालली पण आता फारशी होत नाहीत.बाहेरच्या बागायती कामापेक्षा कमी मिळणारी मजुरी, वनक्षेत्र जास्त असल्याने मर्यादा व अधिकाऱ्यांचे तांत्रिक मार्गदर्शन लवकर न होणे, कामासाठी साईट नसणे असे अनेक कारणे ते सांगत होते पण एकूणच त्याबाबत चिकाटी व इच्छाशक्ती कमी असल्याचे जाणवत होते. शेतीत पुरेसे पिकत नाही आणि  गावात रोजगारहमीची कामे नाहीत. यामुळे पोटासाठी स्थलांतर करणे एवढाच पर्याय लोकांना उरतो. त्यामुळे २२२ कुटुंबांपैकी जवळपास २०० कुटुंबातील लोक पुणे जिल्ह्यातील नारायणगाव परिसरात बागायती शेतीत मजुरीला जातात. जवळपास ८ महीने गावातील तरुण स्त्री पुरुष नारायणगावला जाऊन येऊन असतात. अनेकदा गावात फक्त म्हातारी माणसे आणि लहान मुलेच असतात. गावात इतकी नैसर्गिक साधनसंपत्ती असूनही रोजगार निर्माण होत नसल्याने हे लोक स्वत:ची घरेदारे सोडून पोटासाठी गाव सोडतात. तिथे यांना बागाईतदार ३०० रुपये मजुरी व जेवण देतात. पण सकाळी ७ ते संध्याकाळी ७ असे १२ तास काम करावे लागते.पाठीमागे उभे राहून हे मालक काम करून घेतात. तिथे शेतात गोठा किंवा शेडमध्ये हे लोक राहतात. अशा गैरसोयी झेलत आणि अमानुष कष्ट करीत तिथे जातात. कधीकधी एका शेतकऱ्याचे काम संपले की दुसऱ्याकडे काम लगेच मिळत नाही. अशावेळी स्वत: च्या खर्चाने बाहेर जेवावे लागते. अधूनमधून गावाकडे यायचे शेतीची कामे करायची आणि पुन्हा जायचे. यायचे ते पुन्हा जाण्यासाठीच अशी स्थिती या गावाची आहे. पण सतत स्थलांतर करत राहिल्याने आदिवासी बोलीपेक्षा ते अधिक प्रमाणभाषा बोलतात इतके स्थलांतर मोठे आहे.

            स्थलांतर टाळण्यासाठी दुग्धव्यवसाय, कोंबडी,बकरीपालन का करत नाही ? हे विचारले तर गायी म्हशींच्या अनेक जाती आणल्या पण त्या तिथल्या तीव्र हवामानात टिकत नाहीत असे लोक सांगत होते. जंगलात शेती करण्यासाठी २००५ च्या कायद्यानुसार पूर्वी कसलेल्या जमिनीवर हक्क सांगणारे वनहक्क दावे केले पण १०६ पैकी फक्त ११ दावेच मंजूर केले. २००५ पासून लोक सातत्याने पाठपुरावा आंदोलने करीत आहेत पण दोन एकर जमीन कसायला शासन अजिबात मंजुरी देत नाही. सरपंच सयाजी आसवले वैतागून म्हणाले की अदानी सारख्या उद्योजकाला शासन हजार एकर लगेच देवून टाकते पण गरीब आदिवासीला २ एकर द्यायला शेकडो अटी घालते. एका दुर्गम गावातील सरपंचाची ही समज विलक्षण आश्वासक वाटली. या सरपंचाने गडचिरोलीत जाऊन बांबू लागवड व वस्तुनिर्मिती याचे प्रशिक्षण केले होते व सातत्याने कलेक्टर ला २०० किलोमीटरवर जाऊन अनेक प्रश्नांचा अनेकवेळा जाऊन पाठपुरावा केला होता. इतकी समज आणि धडाडी चिकाटी असलेला सरपंच हीच काय या गावाचे प्रश्न सुटणारी आशा वाटली. सरकारी योजना का मिळवत नाही हे विचारले तर त्यांनी वेगळाच मुद्दा सांगितला. गावात २२२ कुटुंबे आणि शेतीची फक्त ६५ खाते  आहेत. एका उताऱ्यावर तब्बल ३२ नावे आहेत. शेती नावावर नसल्याने त्यामुळे कोणत्याच यो जनेसाठी अर्ज करता येत नाही. यासाठी कलेक्टर पर्यंत अनेकदा जाऊन आले पण जमत नाही. अनेकदा गरीब माणसे ही आळशी असल्याने गरीब राहतात असे अनेकजण बोलत असतात पण या गावात शेती अल्प तिची उत्पादकता नाही ,दुधाळ जनावरे टिकत नाही, वनहक्क जमिनी मिळत नाही ,उतारा नावाचा निघत नाही. अशावेळी दुसऱ्याच्या शेतात जाऊन १२ तास सलग काम करणारी माणसे जमीन आणि योजना मिळाल्या तर स्वत:साठी राबणार नाहीत का ? पण दारिद्र्याचे असे अनेक भौगोलिक आणि मानवनिर्मित पैलू असतात हे कुमशेतने दाखवलं. तालुक्याचे तहसीलदार मुकेश कांबळे यांना खातेफोड या प्रश्नावर विचारलं तेव्हा त्यांनी २० गुंठेपेक्षा कमी खाते फोड करता येत नसल्याने एकेकाच्या नावावर खाते होत नाही पण त्याबाबत काही मार्ग काढता येईल असे सांगितले. प्रशासनासाठी या सर्वात दुर्गम गावाचे प्रश्न महत्वाचे असतात.या गावाला रेशन मिळण्यासाठी सतत प्रयत्न करतो असे ते सांगत होते.अनेक कुटुंबांचे रेशन बंद झाले होते ते सुरु झाले आहे. गावातील लोकांना ही रेशन मिळते आहे याची लोकांशी बोलून आम्ही खात्री केली होती. एवढी एक सुखद बाब सोडली तर रस्ता आणि आरोग्याची आबाळ आहे. रस्त्याचा काही भाग तर सुटी खडी असलेला आहे.त्यामुळे मोटारसायकल ही आम्हाला नीट चालवता येईना. असा रस्ता असलेल्या गावात एखादा पेशंट असेल तर कसे हाल होत असतील ? ही चौकशी केली. तर आरोग्यकेंद्र तिथून ४० किलोमीटर आहे. असा रस्ता गावात मोबाईलची रेंज नाही अशावेळी पेशंट गंभीर झाला तर मरण्याची वेळ येते. कधी गाडीतच एखाद्या महिलेचे बाळंतपण झाले असे अनेक विषण्ण करणारे अनुभव गावकरी सांगत होते. पाठपुरावा करून अजूनही आरोग्यकेंद्र सुरु होत नाही. सर्पदंश अपघात आणि बाळंतपण आणि रेंज नसलेले हे गाव कसे जगत असतील याची कल्पनाच करवेना. एकीकडे सर्वांसाठी आरोग्याची बकबक आणि दुसरीकडे आरोग्याची परवड असणारे हे गाव.. 
         
          तरीसुद्धा स्थलांतर थांबवायला स्थानिक रोजगार हेच उत्तर आहे. सोबतच्या रमाकांत डेरे यांनी बांबू लागवड आणि चंदन लागवड कशी उपयुक्त ठरेल यावर तपशीलवार गावाला माहिती दिली. एक महिला म्हणाली बचत गटात आम्ही बांबूच्या वस्तू केल्या पण कुठे विकाव्या तेच कळेना. त्यामुळे मार्केटही परिचित करून द्यावे लागेल. लोकपंचायत ही स्वयंसेवी संस्था शेतीचा स्तर सुधारणे,शेतीतील प्रयोग,वनौषधी,पशुपालन, महिला उद्योजकता या विषयावर या गावात काम करते आहे. त्यातून काही बदल घडू शकतील. गावाला जंगलावर सामुहिक हक्क आता मिळतो आहे त्याचीही मदत होईल. रोजगाराची आणखी एक संधी म्हणजे हे गाव नितांतसुंदर आहे.कडेला उंचच उंच डोंगर ,अंगावर येणारे कडे. खळाळणारे झरे.  भंडारदरा धरण ,कळसुबाई आणि हरिश्चंद्रगड या पर्यटकांच्या गर्दीच्या तालुक्याच्या त्याच परिसरात असलेल्या या पर्यटन केंद्राकडे अजून पर्यटकांचे लक्ष गेले नाही. सोबतच्या शांताराम गजे यांनी पर्यटन विकास झाले की गावाचे सौंदर्य शांतता कमी होते हा दृष्टीकोन बदलायला हवा असे सांगितले. शेवटी माणसांचा विकास व निसर्ग जपणे दोन्हीही शक्य आहे. गावकरी म्हणाले की पर्यटन विकासासाठी मुख्य रस्ता चांगला हवा. एक रस्ता नसणे त्यांच्या अनेक प्रकारच्या विकासाच्या संधी हिरावून घेत होता. दुर्गम गावात राहणे हे किती जिकरीचे असते हे पदोपदी लक्षात येत होते. गावात शाळा ४ थी पर्यंत.गावात हायस्कूल नाही. पालक सगळे सतत स्थलांतर करीत असल्याने शिक्षणाची आबाळ नको म्हणून सगळी मुले आश्रमशाळेत घालतात. त्यातून मुले शिकत आहेत. १० मुले पदवीपर्यंत पोहोचली पण नोकरी नाही. खाजगी कंपनीत रोजगार करतात.
                 निसर्गाचे इतके भरभरून देणे असताना, श्रीमंत जंगलसंपत्ती असलेले हे गरीब गाव. प्रशासनाच्या आणि कायद्यांच्या कात्रीतले हे कमनशिबी कुमशेत. या निसर्गाचा भाग असलेली ही आदिम माणसे. वेग पकडलेल्या आमच्या जगण्यासोबत कधी येतील ? आम्ही बुलेट ट्रेन चालवताना अजून रस्त्यासाठी झगडताहेत आम्ही एअर अम्ब्युलन्स ने पेशंट नेताना ते झोळीत पेशंट आणताहेत आम्ही चायनीज खाताना ते कोरडा भात खाताहेत आणि आम्ही जगभर विमानाने रोजगारासाठी फिरताना हे सारे गाव निमुटपणे ३०० रुपयासाठी खाली मान घालून १२ तास राबते आहे ..तुमच्या माझ्या जगाच आणि या कमनशिबी दुर्गम अभयारण्यातल्या या माणसातील अंतर कसे सांधायचे हीच खरी चिंता आहे ..भारत आणि इंडिया म्हणतात तो हाच ना  ??
                      
                                                     

                                                      हेरंब कुलकर्णी
                                        herambkulkarni1971@gmail.com
फोन ८२०८५८९१९५ 




टिप्पण्या