गुरुजींची प्रतिभा (हेरंब कुलकर्णी )


                                     
साहित्य,कला आणि सामाजिक क्षेत्रातील शिक्षकांचा परिचय करून देणारा लेख 
                उपक्रमशील शिक्षकांची अनेकदा चर्चा होते पण शाळेबाहेर साहित्य,कला,समाजकार्यात मुशाफिरी करणारे शिक्षकही आहेत..एकेकाळी महाराष्ट्रात सामाजिक,सांस्कृतिक चळवळींचे नेतृत्वच अनेक शिक्षक करीत होते.त्यातून शिक्षक चळवळी साहित्य आणि शिक्षक याचे एक अभिन्न नाते निर्माण झाले . आज अल्पसंख्येने असले तरीही शिक्षक या क्षेत्रात काम करताहेत.
                               सामाजिक आंदोलनात प्रभावी नाव आहे गिरीश फोंडे. कोल्हापूर महापालिका शाळेत शिक्षक पण वर्ल्ड फेडरेशन ऑफ डेमोक्रॅटिक युथ या जागतिक विद्यार्थी संस्थेचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. झिंबावे येथे झालेल्या १५० देशांच्या अधिवेशनात गिरीशची  निवड झाली . आजपर्यंत २० पेक्षा जास्त देशांना भेटी देवून तेथील राष्ट्राध्याक्षांशी भेटी घेतल्या. महापालिकेचा शिक्षक एवढी झेप घेतो हे थक्क करणारे आहे.डाव्या चळवळीतील गिरीशने कोल्हापूर परिसरात २६ गावात दारूबंदी घडवली.. संगमनेर येथील सुखदेव इल्ले व त्यांच्या मित्रांनी आधार फाउंडेशन सुरू केले आहे. यात ते वंचित मुलांच्या शिक्षणाचा वर्षाचा खर्च काढून अनेकांना त्याचे पालकत्व देतात..या आधार गटात सर्व शिक्षक आहेत. महेश निंबाळकर हे बार्शीजवळ पारधी व भटक्या विमुक्त मुलांची निवासी शाळा चालवतात. ही शालाबाह्य मुले गोळा करून त्यांना शिकवण्याचे आव्हानात्मक काम ते करतात.नचिकेत कोळपकर(मालेगाव)राष्ट्र सेवा दलाचा जिल्हा संघटक म्हणून अनेक उपक्रम राबवतो.    
                              अंधश्रद्धा निर्मूलन क्षेत्रात विनायक सावळे हा कार्यकर्ता नंदुरबार जिल्ह्यात काम करतो. नरेंद्र दाभोळकर यांचा आवडता कार्यकर्ता डाकीण प्रथेविरुद्ध संघर्ष करतो. नरसिंग झरे अनसारवाडा (निलंगा)                 या वस्तीशाळा शिक्षकाने गोपाळ समाजासाठी अथक २० वर्षे काम करून या समाजातील महिलांना स्वयंरोजगार  आणि तरुणांना बॅंड पथक काढून दिले. लाखोंची उलाढाल आहे. भटके विमुक्त परिषदेचे तो राज्यस्तरावर काम करतो. किसन चव्हाण हा भटक्या विमुक्तांची लढाई लढतो .त्याचे आंदकोळ हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. विजय सिद्धेवार हे चंद्रपूरला दारूबंदी घडविणार्‍या श्रमिक एल्गार आंदोलनाचे उपाध्यक्ष आहेत.  
                       महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती या अहमदनगर शाखेने संजय कळमकरांच्या नेतृत्वाखाली १८ लाख रुपये जमा करून जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना देवून सामाजिक भान व्यक्त केले .  
                          साहित्यक्षेत्रात कादंबरी लेखन करणारे मराठीत मुळातच कमी लेखक आहेत..पण  रमेश इंगळेंच्या निशाणी डावा अंगठा कादंबरीने  इतिहास घडवला. त्यावरचा चित्रपटही लोकप्रिय आहे.  बालाजी  इंगळे यांच्या झिम पोरी झिम या मुलींच्या शिक्षणावर लिहीलेल्या कादंबरीला राज्य पुरस्कार मिळाला.राकेश वानखेडे यांच्या  पुरोगामी या चळवळींचे विश्लेषण करणार्‍या काद्म्बरीवर मराठीतील महत्वाच्या लेखक व विचारवंतांनी भाष्य करून  कादंबरीचे महत्व अधोरेखित केले. संजय कळमकरांची सारांश शून्य कादंबरीने ग्रामीण शिक्षणाचे वास्तव मांडले.त्यांच्या १२ कादंबर्‍या प्रसिद्ध असून कथाकथनाचे ७०० कार्यक्रम झालेत. बाबासाहेब परीट(सांगली ) या कथालेखकाचे  कथाकथनाचे १५०० कार्यक्रम झाले असून कथाकथनाला विश्व साहित्य समेलनात सिंगापूरला जाऊन आले.त्यांच्या कथेवर लोकमत ने अग्रलेख लिहिला होता . अमरावतीच्या सुनील यावलीकर यांची अस्वस्थ वर्तमानही प्रयोगशील कादंबरी व संतांचे सामाजिक प्रबोधनहे पुस्तक प्रसिद्ध आहे.
                     अशोक कौतुक कोळी चांगली कथा व कविता लिहीतात . कुंधा या कथासंग्रहाला राज्य पुरस्कार मिळालाय. पाथर्डीच्या कैलास दौंड या शिक्षकाने पानधूई व कापुसकाळ या कादंबर्‍या,एका सुगीची अखेर हा कथासंग्रह, तर्होळीचे पाणी हा ललितसंग्रह ,व ४ कवितासंग्रह प्रसिद्ध आहे.
                   कवी होण्यासाठी शिक्षक असणे गरजेचे आहे की काय असा प्रश्न पडावा इतकी महाराष्ट्रातील एकूण कवीत शिक्षकांची संख्या लक्षणीय आहे. वेंगुर्ल्याचे प्रयोगशील कवी वीरधवल परब  यांच्या दर साल दर शेकडा या कवितासंग्रहाला राज्य पुरस्कार व ममा म्हणे फक्त हा नवा संग्रह आहे.नितिन देशमुख (चांदुरबाजार अमरावती) यांची गझल भीमराव पांचाळेनी गायली आहे.पेंगविन या आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्थेने संजय बोरूडे यांच्या इंग्रजी कवितेचे पुस्तक प्रसिद्ध केले तर नोबेल पुरस्कार जर्मन लेखक हर्मन हेस्से याच्या सिद्धार्थ कादंबरीचा व मिनाकुमारीच्या कविताचा अनुवाद असे दर्जेदार लेखन आहे.
                  गोविंद पाटील,(भुदरगड कोल्हापूर ) प्रेमनाथ रामदासी (सोलापूर) , विठ्ठल जाधव व बाळासाहेब गर्कळ (शिरूर बीड) श्रीराम गिरी व सतीश साळुंखे (बीड)संदीप काळे असे अनेक लक्षणीय कवी आहेत.        
               सूर्यकांत डोळसे यांनी १७००० वात्रटिका लिहिल्या असून १३ वर्षे वात्रटीकांचे स्तंभलेखन करीत आहे. या कवितांचे ३० संग्रह प्रसिद्ध असून हे सारे विक्रम ठरावेत .वात्रटिकांसाठी ऑनलाइन साप्ताहिक चालवतात.  भरत दौंडकर (शिरूर पुणे )यांच्या कविता अनेक वृत्तवाहिनीवर दिसतात व त्या whatsapp ग्रुपवर फिरतात इतक्या लोकप्रिय आहेत. रामदास फुटाणेंच्या काव्य सादरीकरणात महाराष्ट्रात शेकडो कार्यक्रमात भरत ने ग्रामीण भागातील वेदना आणि बदलती संस्कृतीवर कविता सादर केल्यात. त्याच्या गोफणीतून निसटलेला दगड या संग्रहाला अनेक पुरस्कार मिळालेत. नागपूरचे प्रसेनजित गायकवाड हे प्रगतशील लेखक संघ चालवितात व विद्रोही चळवळीचे काम करतात.
                 प्राथमिक शिक्षकांची पुस्तके प्राध्यापक शिकवितात. रमेश इंगळे (एकूण ५ विद्यापीठात) कैलास दौंड,संजय बोरूडे,बालाजी इंगळे,  संदीप वाकचौरे यांची पुस्तके विविध विद्यापीठात अभ्यासक्रमात आहेत.श्रीकांत काळोखे(पाथर्डी) हे ६ महीने अमेरिकेतील महाविद्यालयात शिक्षक म्हणून निमंत्रित म्हणून गेले होते.  
                    अधिकारीही लिहू लागलेत. शिक्षणआयुक्त भापकर कवी आहेत तर बोर्डाचे सचिव अनिल गुंजाळ कवितांचे कार्यक्रम करतात.कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. गटशिक्षणाधिकारी नामदेव माळी यांच्या शाळाभेट पुस्तकाला तर शिक्षकांची अस्मिता होण्याच भाग्य लाभले.त्यांनी अनेक शिक्षक,विद्यार्थ्यांना लिहीते केले आहे.    
                       काही शिक्षक स्तंभलेखन करतात. संदीप वाकचौरे (अकोले नगर) हे तीन वर्तमानपत्रात शिक्षणावर स्तंभलेखन करतात. ३०० लेख शिक्षणावर लिहिलेत तर संतोष मुसळे (जालना) व हरीश ससणकर (चंद्रपुर) )स्तंभलेखन व उपक्रमशील शिक्षणावर  लिहीत आहेत. भाऊसाहेब चासकर (अकोले )नागोराव येवतीकर, व्यंकटेश चौधरी (नांदेड) हे लेखनातून शिक्षकांची बाजू प्रभावीपणे मांडतात. .  
                        कलाक्षेत्रात काही शिक्षक आहेत. शाहीर संभाजी भगत हे शिक्षक आहेत. विद्रोही सांस्कृतिक चळवळ,रंगभूमी,शाहीरी यात त्यांचे योगदान महाराष्ट्र जाणतो. अमरावतीचे संजय गणोरकर हे प्रसिद्ध चित्रकार व शिल्पकार आहेत. उमेश घेवरीकर(शेवगाव,नगर) यांनी २५ बालनाटयांचे दिग्दर्शन व १० वर्षे सतत नाट्य अभिनय प्रशिक्षण आयोजित केले आहे. नाट्यलेखनाचा  राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार ही मिळालाय. चित्रपटात भूमिकाही केली आहे.. वसंत आहेर(नगर) हे प्रसिद्ध जादूगार आहेत.त्यांनी लहान मुलांसाठी खास जादूचे प्रयोग विकसित केले आहेत. अमोल बागूल हा बहुआयामी कलावंत आहे.सुनील यावलीकर कोलाज या कलाप्रकारात काम करतात.अनेक शहरात त्याची प्रदर्शने लागलीत.तर अशोक डोळसे या शिक्षकाने खडूवर शिल्प कोरून त्याचे प्रदर्शन भरविले.शेष देऊरमल्ले(चंद्रपुर)काष्ठशिल्प करतात.      
          सुभाष विभूते हे मुलांसाठी ऋग्वेद नियतकालिक चालवितात.
                     शिक्षिका या सर्व प्रकारात का कमी आहेत ?यावर संशोधन करावे लागेल. स्वाती शिंदे (सांगली)तृप्ती अंधारे (लातूर )सुचेता खल्लाळ (नांदेड)या चांगली कविता लिहितात.       
           ही सारी यादी परिपूर्ण नाही.पण हे शिक्षक इतके प्रतिभावंत असूनही शिक्षणविभाग शासन म्हणून त्यांची दखल घेत नाही. यांच्या क्षमतांचा शिक्षणविभागाच्या विकासासाठी उपयोग करीत नाहीत. उलट अनेक अधिकार्‍यांना हे वेगळे शिक्षक शालेय कामाकडे दुर्लक्ष करतात अशीच भावना असते. अर्थात काहींकडून तसे घडत असेल तर तसे व्हायला नको पण या शिक्षकांकडे बघण्याची दृष्टी निकोप नसते हे नक्की.या शिक्षकांनी ही आपल्या क्षमता विद्यार्थ्यात संक्रमित करून कार्यशाळा घ्यायला हव्यात .यातून ही कोंडी फुटू शकेल.शासनाने शिक्षकांचे साहित्य संमेलन विभागनिहाय आयोजित करून लेखक कलावंत शिक्षकांना प्रोत्साहन द्यायला हवे


                            हेरंब कुलकर्णी  herambkulkarni1971@gmail.com

   (हा                                

टिप्पण्या

  1. शिक्षकांचे अन्य क्षेत्रातील योगदान विशद करणारा उत्तम लेख

    उत्तर द्याहटवा
  2. शिक्षकांचे अन्य क्षेत्रातील योगदान, शिक्षांचे नाव व क्षेत्र परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद. पण सरकारी नोकरीत "सब घोडे बारा टक्के" असे असल्याने त्यांचे शिक्षण विभागाला महत्त्व नाही. .

    उत्तर द्याहटवा
  3. महाराष्ट्रातील साहित्य, संस्कृती क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक शिक्षकांना आपण या लेखात समाविष्ट करून एक प्रकारे सन्मानित केले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील चित्रकार शिक्षक साईनाथ फुसे विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन करतात. बीड जिल्ह्यातील सोमनाथ वाळके सर स्वतः अनेक संगीत वाद्य वाजवतात व शाळेत कराओके स्टुडिओ उभारून विद्यार्थ्यांना उत्तम संधी देतात.अशी यादी वाढतच जाईल.पण तुम्ही खूप खूप शिक्षकांना लेखात उल्लेखित केले आहे. अभिनंदन.

    उत्तर द्याहटवा
  4. सर मी संगिता जयराम निकम .जि.प.कडेठाण इथे पदविधर शिक्षिका आहे. मी स्वतः एक कवियत्री अन् लेखिका आहे.निशा कापडे या नावाने लिखाण करते.आपण जो लेख लिहिलात तो अतिशय महत्वाचा आहे.हे खरे आहे की खूप प्रतिभावान शिक्षक आहेत जे लेखन करतात अन् लेकरांना ही लेखनासाठी प्रेरीत करतात.जर शासनाने अशा शिक्षकांचा यथोचित सत्कार केला तर शाळेतील इतर लोकांचा दृष्टिकोन बदलेल.अन् मराठी विषयात अप्रगत राहण्याची टक्केवारी कमी होईल.

    उत्तर द्याहटवा
  5. सर आपण या लेखांमधून शिक्षकांजवळ असलेल्या प्रतिभा शक्तीचे महत्व अधोरेखित केले आहे आणि शिक्षण विभागाने अश्या शिक्षकांना आणखी प्रेरणा द्यावी असा एक संदेशच या लेखात मांडला, आपल्यातील शिक्षकी वृत्तीच्या आपल्या या धडपडीला प्रणाम.....

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा