शिक्षकाला निरोप देताना विद्यार्थी का रडले .....??
मागील
वर्षी तामिळनाडूतील जी.
भगवान या शिक्षकाची बदली थिरूवल्लुरमधील वेलीआग्राम येथून झाल्यावर रडणारी मुले, गावकरी आणि पालक हा फोटो
सर्व देशभर सोशल मिडियात आणि माध्यमात फिरत होता.. या शिक्षकाने या शाळेत फक्त ३
वर्षे असे काही काम केले की त्याची बदली ही राष्ट्रीय चर्चेची घटना
ठरली..त्याचवेळी महाराष्ट्रातील इगतपुरी तालुक्यात वैभव गगे या शिक्षकाच्या बदलीने
विद्यार्थी आणि गावकरी असेच रडले ....जी भगवानच्या बदलीची बातमी शाळेत कळताच मुलांनी
शाळेचे दरवाजे बंद करून घेतले..त्याची स्कूटर दूर नेवून लावली ..त्याची bag लपवून
ठेवली...मुलांनी त्याला मिठी मारली व सर्व शाळा रडायला लागली...प्रभू रामाला निरोप
देताना गीत रामायणातील ‘ थांब सुमंता थांबवी रे रथ’ या गीताची आठवण झाली.. अवघ्या
२८ वर्षाच्या भगवानला मिळालेले हे प्रेम थक्क करणारे आणि हेवा वाटावे असेच आहे....शिक्षक
म्हणून या दोघांनी असे काय केले ?
भगवानचा शिकवण्याचा विषय इंग्रजी....तो
म्हणाला ” मी मुलांना गोष्टी सांगत होतो, मी मुलांशी इतर विषयांवर संवाद करायचो ...गाणी
म्हणत होतो..मुलांशी बोलून मी मुलांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी समजून घेत होतो,
त्यांना भविष्यात करियरच्या संधी सांगायचो ..प्रोजेक्टरवर विविध माहिती दिली ..मी
मुलांसाठी शिक्षक नव्हतो तर मित्र किंवा भाऊ होतो “ मुलांनी रोजची डायरी लिहिणे हा
त्याचा विशेष उपक्रम होता..इंग्रजी विषयापलीकडे तो मुलांना सामान्य ज्ञानाची
माहिती सांगायचा. ती माहिती मुलांना खूप आवडायची. ही त्याची शिक्षक म्हणून असलेली
वैशिष्ट्ये ही कोणत्याही शिक्षकाला अगदी सहज अमलात आणण्यासारखीच आहेत...इतके प्रेम
मिळाल्यावर तो म्हणाला “मला केवळ पगारच मिळाला नाही तर प्रेम ही मिळाले ”
भगवानसारखे आपल्या इगतपुरी तालुक्यात
पांगुळ गव्हाण गावात वैभव गगे या शिक्षकाची बदली झाली तर त्यालाही असेच प्रेम
मिळाले..मुलांसोबत गावकरीही ढसाढसा रडले..या तरुण शिक्षकाची बातमी ‘abp माझा’वर
झळकल्यावर मी आवर्जून त्याची उत्सुकतेने चौकशी केली.वयाच्या २० व्या वर्षी पहिली
नोकरी या गावात स्वीकारली..११ वर्षे काम केले. आगरी आणि कातकरीबहुल असलेल्या या
गावाची पोलीस रेकॉर्डला सतत अशांत गाव म्हणून नोंद आहे.अनेकांवर गुन्हे असलेल्या
अशा गावातील गावकरी ढसाढसा रडतात हे खूप थक्क करणारे आहे. मुलांमध्ये भावनिक
विकसनासाठी त्यांनी ‘श्यामची आई’ पुस्तकातील सर्व गोष्टी मुलांना
सांगितल्या.त्यातून मुले संवेदनशील होण्यास मदत झाली असा अनुभव सांगितला.संगीतमय
परिपाठ सुरु केला..कवितांना चाली लावल्या. शाळा डिजिटल केली ..पालकांशी घरगुती
संपर्क स्थापित केला...त्यातून गावातील भांडणे कमी झाली.मी विचारले “पालक खूप रडले
याचा विचारले “अशिक्षित पालकांना तुम्ही शाळेत जे काही उपक्रम करीत होतात ते कळत असते
का ?” त्यांनी उत्तर दिले “ त्यांना आपण काय शिकवतो ते कळत नसते पण आपल्या
मुलांसाठी काही तरी चांगले घडते आहे हे समजत असते “
हे दोघेही शिक्षक खूप तरुण ऐन तिशीतील
आहेत..इंग्रजी आणि गणित या दोन विषय कसे शिकवले जातात यावर अभ्यासात गोडी लागणे
खूप खूप अवलंबून असते. त्यामुळे इंग्रजी विषय भगवान व वैभवने खूप सोप्या पद्धतीने
शिकवला असेल. त्यामुळे मुलांना विषयाबरोबर हा शिक्षक ही आवडून गेला. त्याचबरोबर तो
इतर माहितीही मुलांना सांगत होता आणि मुलांना ही ती माहिती आवडत होती ..अशी वेगळी
माहिती सांगणारा शिक्षक मुलांना आवडतो. ..या दोघांचा समाजसंपर्क ही अतिशय चांगला
होता...मुलांबरोबर पालक ही रडले यातच गावकरी आणि हे शिक्षक यांच्यात खूप प्रेम
होते. त्यात विशेष गोष्ट म्हणजे या दोन्हीही खेड्यातील बहुसंख्य पालक हे निरक्षर
आणि कष्टकरी आहेत..या वर्गाला शिक्षणाचे महत्व खूप वाटत असते. आपल्या मुलांना
चांगले शिक्षण मिळून त्यांचे आर्थिक सामाजिक वर्ग बदलावेत,आपले कष्ट या मुलांच्या
वाट्याला येऊ नयेत असे त्यांना मनोमन वाटत असते....आणि असा आमविश्वास देणारा
शिक्षक जर त्यांना भेटला आणि त्यांच्या सुख:दुखाशी जोडणारा शिक्षक भेटला तर ते
त्यांच्यावर जीव ओवाळून टाकतात..आज खेड्यात अपडाऊन करणाऱ्या शिक्षकामुळे या
नात्याची वीण काहीशी उसवली आहे...शिक्षक गावात येतात तेव्हा गावकरी कामाला गेलेले
असतात आणि गावकरी गावात येतात तेव्हा शिक्षक गेलेले असतात. विदर्भात एका शाळेतील
शिक्षक गावातील रोज एका घरी चहा पिण्यासाठी जात हा एक उपक्रम यानिमित्ताने आठवला.
यां दोन्ही गावातील पालक शिक्षक नाते विसरता येत नाही...
या दोन शिक्षकांना इतके प्रेम का बरे
मिळाले असेल ? यामागची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा या दोन
शिक्षकांच्या निमित्ताने मला साने गुरुजींची आठवण झाली.साने गुरुजींवर पुस्तक
लिहिताना मी अमळनेर ला गेलो होतो. आता गुरुजींचे फार माजी विद्यार्थी जिवंत नाहीत.
बोहरी मुस्लीम जमातीतील एक ९० वर्षाचे वृद्ध आता उरले आहेत. मी त्यांना भेटायला
गेलो आणि गुरुजी हे केवळ नाव काढताच जणू साने गुरुजी काल गेले अशा वेदनेने ते
वृद्ध गृहस्थ रडू लागले.. मी थक्क झालो. गुरुजी गेल्यावर ६७ वर्षांनी त्यांचा ९०
वर्षांचा विद्यार्थी रडत होता...तेव्हा एखादा शिक्षक मुलांच्या भाव विश्वात किती
खोलवर रुजू शकतो याचा प्रत्यय आला...
विद्यार्थ्यांचे
प्रेम मिळण्याचे आणखी एक कारण शिक्षा न करणे हे असते. साने गुरुजींनी मुलांना उगाच
धाक लावणे ,शिक्षा करणे असे केले नाही ...त्यातून मुले भीतीविना त्यांच्याकडे आकृष्ट
झाली..कोणत्याही शिक्षकांचा भर विद्यार्थ्यांना सुधारण्यासाठी शिक्षा करण्यावर
असतो किंवा चुका दाखवण्यावर असतो. साने गुरुजींनी चुका दाखवण्यापेक्षा दुरुस्त
करण्यावर भर दिला.वसतिगृहात विद्यार्थी कपड्यांच्या घड्या करीत नसत,अंगणातच संडास
करीत पण गुरुजी मुकाटपणे ते सारे साफ करीत. त्यांनी मुलांना कृतीतून उपदेश केला
आणि मुले खजील झाले..शिक्षकांनी न्यायाधीश आणि पोलीस होण्यापेक्षा अशीही एक वेगळी
पद्धत मुलांना सुधारण्याची असते... मुलांनी मारामारी केली तर साने गुरुजी काय करायचे
?असा प्रश्न मी त्यांचे विद्यार्थी सराफ सरांना विचारला. तेव्हा ते म्हणाले की
दोन्ही मुलांना गुरुजी जवळ घेवून कवटाळत आणि अरे असे नसते करायचे ...असे म्हणत
राहायचे....ही प्रेमाने चुकांची जाणीव करून देण्यातून मुलांना शिक्षकांविषयी जास्त
माया वाटते..या दोन शिक्षकांचे वर्तन या प्रकारचे असले पाहिजे..साने गुरुजी
म्हणायचे की शिक्षकाच्या व्यक्तीमत्वात एक सौम्यता असली पाहिजे..मुलाशी बोलताना
आणि हाताळताना खूप सौम्यता असली पाहिजे असे गुरुजी म्हणायचे .हे दोन शिक्षक नक्कीच
तसे आहेत.
या
शिक्षकांच्या निमित्ताने मला ओशो रजनीश आठवतात.हे शिक्षक मुलांशी खूप प्रेमाने
वागत आहेत त्यामुळेच मुले ढसाढसा रडली... ओशो लिहितात की लहान मुलांशी खूप
प्रेमाने आणि सौम्येतेने वर्तन करणे आवश्यक असते त्यामुळे प्राथमिक शाळेतील सर्व
पुरुष हटवले पाहिजेत आणि त्याजागी सर्व शिक्षिका च असल्या पाहिजे. रजनीशांच्या
नेहमीच्या धक्कातंत्र शैलीने त्यावर चर्चा झाली...पण त्यापुढे जाऊन ओशो जे म्हणाले
ते महत्वाचे आहे. ते म्हणतात की शिक्षक महिला असाव्यात पण शिक्षणात स्त्रैण असणारे
शिक्षक असायला हवेत म्हणजे प्रेम करुणा सौम्यता सेवाभाव वात्सल्य ममता ही स्त्रैण
असणारी मुल्ये त्या शिक्षणात असायला हवीत..महिलांमध्ये ही मुल्ये प्रधान असल्याने
त्या शिक्षण क्षेत्रात असल्या पाहिजेत.पण ही मुल्ये पुरुषात पण असतात म्हणूनच
ज्ञानेश्वर आणि साने गुरुजी यांना आंपण पुरुष असूनही माउली म्हणतो...या वयात
मुलांना जर कठोर वागणारे शिक्षक असले तर त्यांच्या भावविश्वाची मोडतोड होते असे
त्यांचे म्हणणे होते....
आपल्याकडे शाळेत मुलांना मारू नका यासाठी
कायदा करावा लागतो यातच सारे आले..पण तरीही मुलावर प्रेम करणारे भगवान आणि वैभव
सारखे खूप खूप शिक्षक आहेत. प्रेम हा त्यांचा स्थायीभाव आहे. हे राज्य तामिळनाडू
असो कि महाराष्ट्र ..शिक्षक विद्यार्थी नाते दोन्हीकडेही दिसले ....दोघे शिक्षक हे
प्रेममय शिक्षकांचे प्रतिनिधी आहेत.. प्रेम हीच शिक्षकांची आणि शिक्षणाची भाषा
असली पाहिजे ..हाच या विद्यार्थ्याच्या अश्रुचा सांगावा आहे....ती प्रेमाची भाषा
देशातल्या सर्व शाळांची बनवू या
हेरंब कुलकर्णी
herambkulkarni1971@gmail.com
(हा लेख ५ सप्टेंबर २०१८ ला अक्षरनामा पोर्टलवर
प्रसिद्ध झाला आहे )


Khup chan sir!!
उत्तर द्याहटवाछान लेख . आपणही एकेकाळी या वंचित वर्गाचे प्रतिनिधी होतो एवढेच शिक्षकांनी लक्षात ठेवलं तरी खूप चांगलं काम होईल .
उत्तर द्याहटवाअप्रतिम लेखन ,वाचतांना दोनही शिक्षकांचा हेवा वाटला ..
उत्तर द्याहटवा