हेरंब कुलकर्णी यांची मुलाखत


                  हेरंब कुलकर्णी यांची मुलाखत



तुमची आजपर्यंत प्रसिद्ध झालेली पुस्तके कोणती ?
शाळा आहे शिक्षण नाही 
परीक्षेला पर्याय काय ? (उत्कृष्ट संपादनाचा राज्य पुरस्कार )
सहावा वेतन आयोग :काय खरे काय खोटे 
कॉमन मॅन (कविता संग्रह )
आमच्या शिक्षणाचे काय 
जे.कृष्णमूर्ति आणि कृष्णमूर्ति स्कूल 
बखर शिक्षणाची 

आगामी 
माझी शिक्षण परिक्रमा 

पुस्तिका 
बालविवाह एक सामाजिक कलंक 
गुणवत्ता शिक्षणासाठी एजुयुकेशन व्हाऊचर्स 

पुणे विद्यापीठाने प्राथमिक शिक्षणावर विशेष व्याख्यान आयोजित करून त्याची पुस्तिका प्रसिद्ध केली 

अनुवाद 

शाळा आहे शिक्षण नाही या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद दिल्लीच्या प्रकाशनाकडून लवकरच प्रसिद्ध होईल 

तीन कवितांचे हिन्दी व इंग्रजीत अनुवाद 

दोन अखिल भारतीय साहित्य समेलनाच्या निमंत्रित कवीसमेलनात सहभाग
यातील प्रसिद्ध झालेले शाळा आहे शिक्षण नाही हे पुस्तक नेमके कशाविषयी आहे ?
हे पुस्तक शिक्षणाच्या गुणवत्तेविषयी आहे. शासन आज ३५००० कोटी शिक्षणावर खर्च करते आणि मुलांना किमान क्षमता ही प्राप्त होत नाहीत हे वास्तव मला मांडायचे होते .तेव्हा एका तपासणीच्या निमित्ताने गेल्यावर गडचिरोली,,चंद्रपुर,मेळघाट,नंदुरबार,यवतमाळ,मेळघाट या आदिवासी भागातील २०० शाळांना मी भेटी दिल्या .त्यावेळी मुलांना किमान वाचन लेखन येते का ?याची मी चाचपणी केली.त्यात ४ थीच्या मुलांना मी चंद्रपुर जिल्ह्यात आम्ही रेल्वेने प्रवास करतो हे वाक्य लिहायला दिले आणि गणितात ५११ वजा ४९९ ही वजाबाकी दिली पण आश्चर्य वाटेल की २०० शाळांतील हे वाक्य व गणित बरोबर सोडविणारा एक ही वर्ग नव्हता..तीन शिक्षकांचेही हे गणित चुकले..मला ५२ गावे अशी सापडली की ज्यात गावात ५० वर्षापासून शाळा आहे पण ७ वी शिकलेला माणूस नाही. दर्जेदार शिक्षण नाही हे ही गरीबीचे महत्वाचे कारण लक्षात आले.याच पाहणीत मी आश्रमशाळा ही बघितल्या.त्यातली उपाशी मुले आणि भीषण वास्तव मी मांडले. अमर्त्य सेन यांचे प्रसिद्ध वाक्य मला उमगले की गरिबांसाठीच्या सुविधा शेवटी गरीब सुविधा बनतात. वाईट शिक्षणातून गळती,गळतीतून दारिद्र्य आणि दरिद्री भागात पुन्हा दर्जाहीन शिक्षणसुविधा हे वास्तव कळाले. एकीकडे २०२० ल महासत्ता होण्याची भाषा करताना महाराष्ट्राचे शिक्षण वास्तव पुढे आले. एकीकडे आमची मुले सिलिकॉन व्हॅलीत तर त्यांची मुले मेळघाट व्हॅली त पाखरं मारताहेत हा शिक्षणातला भारत इंडिया लक्षात आला
या पुस्तकावर प्रतिक्रिया काय होत्या ? या पुस्तकाच्या वेळी काय वाद झाला होता ?  
                  हे पुस्तक आल्यावर एका शिक्षक संघटनांने ते जाळले.अनेक शिक्षकांनी फोन करून तीव्र भावना तर काहींनी अपशब्द वापरले . अनेक ठिकाणी त्यावर तीव्र संताप व्यक्त झाला.पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली.काही शिक्षकांनी हे वास्तव तुम्ही मांडले हे चांगले केले असेही सांगितले. आदिवासी विभागाने आश्रमशाळा विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली.  विधांनसभेत त्यावर चर्चा झाली पण त्याचवेळी माध्यमे व शहरी वाचकांना हे भीषण वास्तव समजले. या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद झाला. शासनाने हे पुस्तक शिक्षक प्रशिक्षणात चर्चेसाठी लावले. माझ्या या पहिल्याच पुस्तकाच्या प्रतिसादाने मी गोंधळून गेलो
२००७ च्या या पुस्तकानंतर शिक्षणाच्या गुणवत्तेत काही फरक पडलाय का ?
फरक थोडासा जाणवतो. तंत्रज्ञानाचा शाळांवरचा वापर वाढलाय. प्रयोग शील शिक्षकांची संख्या वाढते आहे परंतु असर किंवा शासन जी पाहणी दरवर्षी करते त्यात अजूनही फारसा फरक पडला नाही. मागच्या वर्षी ५० टक्के मुलांना लेखन वाचन येत नाही तर ७६ टक्के मुलांना गुणाकार येत नाही असा निष्कर्ष येत नाही. १० वर्षे सर्व शिक्षा अभियान आणि ४ वर्षे शिक्षण कायदा राबवूनही ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा वास्तव बदलले आहे असे वाटत नाही .मात्र गळतीचा दर नक्कीच कमी झाला आहे. सरकारी शिक्षणाच्या या नाराजीतुन खाजगी शाळेत मुले घालण्याचे प्रमाण खूप वाढते आहे.अगदी झोपडपट्टीतले पालक सुद्धा आपली मुले खाजगी शाळेत घालत आहेत. आज भारतात उच्च शिक्षणात पोहोचण्याचे प्रमाण १९ टक्के आहे याचे कारण प्राथमिक शिक्षण दर्जेदार नसल्याने वाचन लेखन कौशल्य प्राप्त न झालेली मुले शाळा सोडून देतात. गरीबी हे शाळा सोडण्याचे दुय्यम कारण आहे खरे कारण वाचन लेखन न आल्याने मुले शाळा सोडतात
तुम्ही महाराष्ट्रातील ऊसतोड कामगार ,बालकामगार अशा २० जिल्ह्यात फिरून शालाबाहय मुलांचा अभ्यास केला..आणि दुसरीकडे शासन शाळा बंद करते अशा बातम्या आहेत ?शालाबाह्य मुलांची काय स्थिती आहे ?
                   देशात आजही ३ कोटी तर महाराष्ट्रात ८ लाख मुले शालाबाह्य आहेत असा अंदाज आहे. ही मुले बालकामगार ,रेल्वे प्लॅटफॉर्म,रस्त्यावर राहणारी ,वेश्यांची मुले त्याचबरोबर पोटासाठी स्थलांतर करणारी ऊसतोड कामगार ,वीटभट्टी मजूर, दगड खाण मजूर बांधकाम मजूर यांची आहेत.भारतात आज राज्या राज्यात स्थलांतर करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. मुंबई ट परभाषिक मजुरांसोबत हजारो मुले येतात.एकट्या महाराष्ट्रात अशी १ कोटी पेक्षा जास्त परभाषिक कुटुंबे आहेत. देशात ११ कोटी भटके विमुक्त आहेत. त्यांची लाखो मुले शाळेबाहेर आहेत. आदिवासी भागात गळती खूप मोठी आहे. पण या शाळेबाहेरच्या मुलांची चर्चा होत नाही...हे वास्तव पुढे आणण्यासाठी मी २० जिल्ह्यात फिरून या मुलांचे वास्तव अभ्यासले.तुम्ही म्हणता त्याप्रमाणे राज्यात आज १३००० शाळा या १५ पेक्षा कमी पटसंख्येच्या आहेत. तेव्हा शासन त्या बंद करून ती मुले जवळच्या शाळेत टाकते आहे.त्याला अनेक पैलू आहेत .काही शाळा एकमेकाजवळ अंतराचा निकष न पाळता सुरू केल्या आहेत.तेव्हा प्रत्येक शाळेचा नेमका प्रश्न तपासून चर्चा व्हावी पण शिक्षण हक्क कायदा येवूनही ३ कोटी मुले शाळेबाहेर असणे हे डिजिटल इंडिया ची भाषा बोलणार्‍या सरकारला भूषणावह नाही
तुमचे बखर शिक्षणाची हे पुस्तक (राजहंस प्रकाशन )येते आहे .यात तुम्ही शिक्षक पालकांनी वाचावयाची पुस्तके परिचय करून दिली आहेत..ही पुस्तके कशी निवडली ?
शिक्षक वाचत नाहीत हे वाक्य इतक्या वेळा लिहीले जाते की ते लिहिलेले वाक्यही शिक्षक वाचत नाहीत..तेव्हा शिक्षकांना वाचते करण्यासाठी ललित किंवा वैचारिक पुस्तके ते एकदम वाचणार नाहीत .तेव्हा त्यांच्या शिक्षकी पेशातीलच जास्तीत जास्त पुस्तके त्यांना सुचवली पाहिजेत त्यातून एकतर ते वाचक होतील आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ते शिक्षक म्हणून ही समृद्ध होतील. त्यांना प्रयोगशील शिक्षकांची पुस्तके वाचून प्रेरणा मिळेल म्हणून मग मी शोध घेतला तेव्हा मराठीत ८० पेक्षा जास्त पुस्तके फक्त शिक्षण विषयक आहेत .त्यात जगभरातून अनेक पुस्तके अनुवादित झाली आहेत. तोत्तोचान,समरहिल,सर विथ लव्ह यासारखे मास्टरपीस मराठीत आले आहेत....तेव्हा या पुस्तकांनी वाचनाची सुरुवात व्हावी असे वाटले.मी सुरवातीला अशा पुस्तकांच्या याद्या केल्या पण लक्षात आले की केवळ नावे सांगून पुस्तकाविषयी उत्सुकता निर्माण होत नाही .तेव्हा निवडक ६० पुस्तकांचा परिचय करून देणारे पुस्तक असे पुस्तकावरचे पुस्तक लिहिले
    पालकांसाठी हे महत्वाचे आहे की पालकांना जर खरे शिक्षण कशाला म्हणतात हे कळाले तर पालक चुकीच्या अपेक्षा मुलांकडून व शाळांकडून करणार नाहीत.या पुस्तकाच्या निमित्ताने मराठीत शिक्षणविषयक साहित्य अशी एक नवी चर्चा सुरू होऊन याप्रकारचे साहित्य अधिक वाढेल असे वाटते.
भारतातल्या कृष्णमूर्ति च्या सर्व शाळा तुम्ही बघितल्या आणि त्यावर तुमचे जे.कृष्णमूर्ति आणि कृष्णमूर्ति स्कूल्स हे पुस्तक ही नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.. या शाळांचे तुम्हाला काय वेगळेपण वाटले ?
शाळा आणि तुरुंग या जगातल्या दोनच अशा जागा आहेत की जिथे कुणीच स्वत: होऊन जात नाही ,दाखल करावे लागते असे भेदक वाक्य बोलणारे कृष्णमूर्ति हे शिक्षण चिंतक म्हणून जगाला परिचित नाहीत. ते केवळ तत्वज्ञान मांडून थांबले नाहीत तर त्यांनी ५ शाळा काढल्या.. या शाळेत विविध प्रयोग केले.निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या शाळा ,संध्याकाळी सूर्यास्त पाहण्याचा उपक्रम असलेल्या शाळा ,शिक्षा आणि बक्षिसे नसलेल्या शाळा ,परीक्षेऐवजी मूल्यमापन पद्धती विकसित केलेल्या शाळा मी बघितल्या.उत्तरप्रदेश ,महाराष्ट्र ,आंध्र प्रदेश,कर्नाटक,तामिळनाडू येथे जाऊन या शाळेत मी राहिलो आणि शाळा समजून घेतल्या. कृष्णमूर्ति ची पुस्तके वाचून मी कॉलेज ला असताना मी घाबरून ते पुस्तक मी रद्दीत टाकले होते पण नंतर त्यांची मला ८० पुस्तके विकत घ्यावी लागली..डी एड बी एड च्या अभ्यासक्रमात कृष्णमूर्ति परिचय कुठेच नाहीत त्यामुळे शिक्षकांना कृष्णमूर्ति माहीत होत नाहीत..या पुस्तकामुळे शिक्षक व पालकांना कृष्णमुर्ती आणि त्यांच्या शाळा पालकांना माहीत होतील.
तुम्ही स्वत:च्याच घरात बालवाचनालय सुरू केले आहे यामागची भूमिका काय आहे ?
           महाराष्ट्रात १५ ऑक्टोबर ला वाचन प्रेरणा दिन साजरा झाला. यानिमित्ताने केवळ वाचन संस्कृतीवर अरण्यरुदन करण्यापेक्षा आपण स्वत: सुरुवात करावी असे वाटले. बुलढाणा येथील माझे मित्र व ग्रंथपाल म्हणून विविध उपक्रम राबविणारे नरेंद्र लांजेवार(९४२२१८०४५१) यांनी बुलढाण्यात गल्लोगल्ली अशी ५० बालवाचनालये सुरू केली आहेत. त्यातून लहान मुलांची एक वाचन चळवळ तिथे उभी राहिली आहे.त्यांच्यापासुन प्रेरणा घेतली.  आमच्या घराच्या परिसरात  कष्टकरी कुटुंबातील मुले राहतात .त्या मुलांवर हा वाचन संस्कार महत्वाचा आहे. या ५० मुलांसाठी आम्ही आमच्या घरात मोफत ग्रंथालय सुरू केले . या मुलांसाठी आम्ही २५० लहान मुलांची पुस्तके आणली आहेत. सर्वात छोट्या वाचकाच्या हस्ते या बालवाचनालयाचे उद्घाटन केले . आपल्या घरातली पुस्तके मुलांना आज खुली करून देण्याची ही चळवळ वाढायला हवी.

                                                            हेरंब कुलकर्णी
                                                 herambkulkarni1971@gmail.com
                                                            फोन 9270947971

परीक्षेत नापास झाल्यामुळे आत्महत्या करण्याचे प्रमाण वर्षाला ४००० आहे .यावर चर्चा घडविणारे पुस्तक मी परीक्षेला पर्याय काय ?हे संपादित केले .त्याला उत्कृष्ट संपादनाचा राजी शासनाचा पुरस्कार २०१० मध्ये मिळाला.राजकीय कवितांचे कॉमन मॅन हा संग्रह प्रसिद्ध आहे

   

टिप्पण्या