नुकतीच बडोद्याजवळ हॉटेलच्या सेप्टिक टाकीची साफसफाई करताना ७ मजुरांच्या मृत्यूची बातमी चटका लावून
गेली.अधूनमधून या बातम्या सुरूच असतात. अतुल पेठे यांची ‘कचराकोंडी’ फिल्म बघितल्यापासून सफाई कामगारांच्या वेदनेने हलविले होते.त्यातील गटारात डुबकी मारणारे केविलवाणे चेहरे अजूनही विसरता येत नाहीत. तेव्हा या समूहाच्या वेदना समजून घेण्याचे ठरवले.
सकाळी सकाळी पुणे शहराच्या महापौर बंगल्याजवळच्या ward ऑफिसला पोहोचलो.. जेसीबीने काम सुरु होते
.शहरातून आलेल्या गाड्या मोठ्या गाडीत कचरा रिकामा करीत होत्या. सकाळच्या शांत वातावरणात फक्त मशीनचा आवाज येत होता, सगळीकडे उठणारा धुराळा आणि पसरलेला वास. तो वास परिचित नसल्याने सहन करणे कठीण. कुणी पाणी मारीत होते. कामगार येणे ,कपडे बदलणे, सही करणे हे अनेक कामगारांचे सुरु होते.
आम्ही ward ऑफिसमध्ये बसलेलो. पुणे महापालिका कामगार संघटनेच्या (मान्यताप्राप्त) नामदेव लोंढेनी काही
सहकारी एकत्र जमवले होते.कोणीतरी आपले दुखणे समजून घ्यायला आले आहे याचे त्यांना अप्रूप वाटत होते. रोज सकाळी तिथे येतात आणि तक्रारी दूर करायला निघतात. तक्रारी कोण करते ? हे विचारताच सगळेच खवळले. ते म्हणाले कोण करीत नाही ते विचारा ? online तक्रारी येत्यात, फोनवर लोक तक्रार करतात. सगळ्यात जास्त त्रास त्यांना नगरसेवकांचा व त्यांच्या कार्यकर्त्यांचा होता. वार्डातील लोक त्यांच्याकडे तक्रार घेवून आले की ते लगेच त्यांच्यासमोर फोन करतात, त्यांचे कार्यकर्ते सतत फोन करत राहतात पण त्याचवेळी कुठेतरी काम सुरु असते.ते पूर्ण करावे लागते.पण कार्यकर्ते ऐकत नाहीत. ते सतत बोलावत राहतात. त्यात कामगारांची खूप ओढाताण होते.
आम्ही बसलो तिथे आनंद नावाचा तरुण पकडलेला साप घेवून आला. सफ़ाई कामगार असून तो सर्पमित्र होता.
अनेक ठिकाणी जुन्या गटारीत उंदीर घुशी होतात व तिथे साप निघतात असे तो सांगत होता. त्यातून याला अनेक
ठिकाणी साप निघाला की बोलावतात. यांच्या कामाची जोखीम लक्षात येत होती .
मला प्रत्यक्ष गटार साफ करताना बघायचे होते. कामगारांसोबत निघालो.सगळे त्यांच्या गाडीवर निघाले.
दुचाकीवर दोघे दोघे निघाले. गर्दीतून जाताना रस्ता चुकत होता. एकाने हातात मोठा दांडा घेतला होता.त्याकडे लक्ष ठेवा म्हणाले. त्याकडे बघत बघत आम्ही त्यांच्या मागे मागे जात होत्तो. अखेर संगमवाडी पुलाजवळ पोहोचलो. त्या पुलाच्या आजूबाजूला अनेक वस्त्या होत्या. एका ठिकाणी गटार तुंबली होती. डोक्यावर मे महिन्याचे बारा वाजताचे कडक उन होते. आजूबाजूची घरे बंद होती.हे लोक बघताच दारे किलकिले झाली. काही लोक बाहेर येऊन लगेच किती गटार तुंबलीय हे ऐकवताहेत. ते लांबून दाखवताहेत. पुन्हा किलकिले दारे बंद झाली.. गटारीचे प्रचंड जड झाकण उचलून बाजूला टाकले. ते उचलून टाकणे मोठे कठीण होते.. पायावर पडण्याची शक्यता असते. घामाघून होत ते झाकण उचलून टाकले.
प्रत्येकी ५ फुटांच्या २० गजांचा संच सोबत होता. त्याला स्क्रू असतात. एका गजाला स्क्रू लाऊन लांबी वाढवली
जाते. २५ ते ३० फुट लांब केले जातात गटार स्वच्छ केले जातात. तीन चार जण एकदम काम सुरु करतात आणि
गटारीच्या तोंडात अडकलेला कचरा बाजूला काढला जातोय..बराच वेळ मे महिन्याच्या कडाक्याच्या उन्हात राहिल्याने आता सगळेच घामाघूम झाले आहेत.. उन वाढल्याने तिथे थांबणे अशक्य झालेय. मी दूर एका एका घराच्या सावलीतून हे सारे बघतोय. त्यांना तहान लागलीय. आजूबाजूच्या घरातून पाणी मागून ते पितात. पुन्हा घाम पुसतात. तिथला गाळ निघाला. तो काढून बाजूला टाकला.कचरा निघताच पाणी वाहते झाले. घामेजलेल्या चेहर्यावर हसू दिसले.पुन्हा एकदा ताकद लावून ते प्रचंड जड झाकण त्या गटारीवर टाकले. मोठ्ठा आवाज झाला. आजूबाजूच्या लोकांना काम झाल्याचे सांगितले आणि पुढच्या कामाला आम्ही निघालो.त्यांच्या गाडीमागे आमची गाडी. एका colony च्या टोकाला मोठे गटारीचे झाकण.. ही गटार खूपच खोल होती. त्यामुळे थोडे जास्त कष्ट घ्यावे लागत होते. पुन्हा गजाला गज जोडून लांब गज तयार केला आणि पुन्हा अडकलेला कचरा काढणे सुरु झाले. कचरा बाहेर येवून पडू लागला. कचरा प्लास्टिक आणि हॉटेलच्या पदार्थांचा, अन्नपदार्थांचा दिसू लागला. अडकलेला कचरा कोणकोणता असतो ? असे विचारले. तेव्हा त्यातील एकजण म्हणाला “ साहेब सांगताना लाज वाटते पण लोकांनी काही गोष्टी लोकांनी ठरविल्या तर आमचे काम कमी होईल. अनेक ठिकाणी महिला सनिटरी नपकीन स्वच्छतागृहात किंवा गटारीत टाकतात. ते वाहत येऊन गटारी ठप्प होतात. महिलांनी हे टाळायला हवे. त्याचप्रमाणे थर्माकोल, चिंध्या याही गटारात खूप वेळा सापडतात”. हॉटेलविषयी ते खूप वैतागून बोलत होते. जिथे जिथे हॉटेल तिथे तिथे गटार तुंबते. वास्तविक हॉटेलची गटार जिथे जोडली जाते तेथे एक जाळी बसविणे आवश्यक असते की ज्यात हॉटेलमधील अन्नपदार्थ अडकतील पण हॉटेल ते करत नाही त्यामुळे अन्नपदार्थ
आणि निरमा पावडर, कचरा असे सर्व एकमेकाला चिकटून मोठे लगदे तयार झालेले ते दाखवत होते. त्याचप्रमाणे
चौकाचौकात असलेल्या खाद्यपदार्थाच्या गाड्या उरलेले खाद्यपदार्थ, कचरा,खरकटे गटारात टाकत राहतात व गटार तुंबते व आमचे काम वाढते. हे सारे तपशील ते एकएक कचरा दाखवून सांगत होते.. त्यात पुन्हा पूर्वी wardची लोकसंख्या कमी होती आता ती कित्येक पट वाढली. मोठ्या इमारती वाढल्या पण तेव्हा असलेली कामगार संख्या मात्र त्या प्रमाणात वाढली नाही. त्यामुळे कामाचा खूपच ताण येतो असे ते म्हणाले.
अनेकदा ड्युटी ८ तासापेक्षा जास्त होते. कामाहून निघताना फोन येतो मग जावेच लागते. पुन्हा कधीकधी गटार
चोक अप होऊन problem निघत नाही अशावेळी काम सोडता येत नाही कित्येक तास काम सुरुच राहते. दिवाळी किंवा महत्वाच्या सणवाराला ही कामाच्या ड्युट्या असतातच.पावसाळ्यात तर खूपच तणाव असतो. गटारीत न उतरता जेटकिंग मशीनने सफाई होऊ शकते पण ती मशीन संखेने खूप कमी आहेत त्यामुळे गटारीत उतरावेच लागते.
तिथले काम संपल्यावर पुन्हा बोलू लागलो. पुणे महापालिका कामगार युनियनविषयी सर्वांच्याच मनात खूप आस्था
आणि कृतज्ञता दिसली. युनियनमुळे गणवेश,बोनस, वेतन, भत्ते, वारस कामावर घेणे, २५ वर्षाच्या नोकरीनंतर घर अशा अनेक सुविधा मिळाल्याचे सांगत होते.आरोग्यविषयक सुविधाही संघटनेमुळेच मिळतात. कामगार कल्याण निधी स्थापन झाला. अपघात झाला, अन्याय झाला तर संघटना मदतीला धावते. शिष्यवृत्ती मिळते पण तरीही कामगारांच्या मुलांची शिक्षणातून गळती मोठ्या प्रमाणात होत राहिली आणि पुढची पिढी पुन्हा याच कामात येत गेली पण आता चित्र बदलते आहे. मुले मुली शिकू लागलेत.
काही वेळाने त्यांना आजार काय होतात हे विचारले. तेव्हा आमच्या वस्तीत म्हातारा माणूस दाखवा आणि हजार
रुपये मिळवा असे एकजण म्हणाला व सगळेच जोरात हसले.त्या हसण्यात एक विषण्णता होती.या कामामुळे आमच्यात माणसे जास्त जगत नाहीत. विविध आजार जडतात.गटारीत मेलेल्या उंदीर आणि घुशी असतात. त्वचेचे आजार होतात.खरुज आणि गजकर्ण होतो. टीबी तर हमखास अनेकांना गाठतो. रक्ताच्या गाठी होतात. घाणीत काम करताना ते सहन करताना काहीना व्यसन लागते. यां अनेक कारणांनी आयुर्मानच कमी होऊन जाते. गटारीत तारा, इंजेक्शनच्या सुई वाहत येवून घुसतात. एका कामगाराच्या पायात नंतर गंगरीन झाले होते. गेल्या काही वर्षांत त्यांचे कोणकोणते सहकारी मृत्यू झाले हे ते एकमेकात सांगू लागले. तेव्हा यातील भयावहता लक्षात आली.
पुन्हा इतके करूनही आम्हाला कोणीच आदराने वागवत नाहीत.प्रशासन नगरसेवक आणि लोक सगळेच आम्हाला कामचुकार समजतात.लवकर गेले नाही की शिवीगाळ करतात. काही ठिकाणी चेंबरवर लोकांनी घरे बांधलीत आणि ते दुरुस्तीच्या वेळी कुलूप लाऊन निघून जातात.त्यामुळे चकरा माराव्या लागतात.फरशी धुवून मागतात. अशा अनेक अडचणी सांगत होते. एक कर्मचारी म्हणाला “ सांगताना लाज वाटते पण लोक साधाही विचार करीत नाही. एकदा आमचे लोक मोठ्या गटारीत उतरले होते. जवळच्या घरातल्या लोकांनी ते बघितले तरी त्यांनी संडास वापरला आणि ती घाण कर्मचाऱ्याच्या अंगावर पडली ....” सांगताना त्याच्या डोळ्यात पाणी तरळले. वातावरण सुन्न झाले.
या कामगारांच्या घरची स्थिती विचारली तर अनेकांच्या बायका इतरांची धुणी भांडी अशी कामे करतात.तर काही गृहिणी आहेत. मुले मात्र आता सगळ्यांचीच शिकतात.
संगम पुलाजवळचे काम आवरले.या कामगार संघटनेच्या नेत्या मुक्ता मनोहर यांना भेटलो.त्यांनी या कामगारांना
आत्मविश्वास दिला आहे. त्यामुळे भेटावेसे वाटले. त्या म्हणाल्या हे काम अमानुष आहे पण लोक सहजपणे ‘ त्यांना सवय झालेली असते’ असे असंवेदनशीलतेने बोलतात. या कामात कंत्राटीकरण ही नवीच समस्या आली आहे. manhole मध्ये या कामगारांना उतरायला भाग पाडले जाते. या कामगारांना नोकरी आणि मोबदला यां दोन्हीची शाश्वती नाही आणि संघटीत करणेही खूप कठीण आहे. कायम कामगाराइतके त्यांचे प्रश्न सोडविणे संघटना महत्वाचे मानते. संघटनेची ही संवेदनशीलता खूप भावली. सफाई कामगारांना ५६३ घरे मिळवून दिली आता उर्वरीत घरे मिळवून देण्याचा लढा सुरु आहे. याबरोबर मेहतर कामगारांना भोगाव्या लागणाऱ्या वेदनांचे वेगळेच जग त्या सांगत होत्या.अजूनही झोपडपट्टीजवळ लोक संडास करतात. या महिलांना ती रस्त्यावर साफ करावी लागते. तिथले महापालिकेचे संडास पाण्याअभावी घाण होतात.महिला ही अशी कामे करून depression मध्ये जातात.
निघताना सोबतचे मित्र अशोक व्यवहारे म्हणाले “ शिकलेल्या माणसांनी घाण करायची आणि निरक्षर माणसांनी ती साफ करायची. यात शिकलेला कोण ? असा प्रश्न पडतो. सहज वाटून गेले की सनिटरी नपकीन, थर्माकोल, हॉटेलचे, हातगाड्यांचे खाद्यपदार्थ याबाबत महिला,कामगार, हॉटेलचालक या सर्व घटकानी जर काळजी घेतली तर आपल्यासारख्या जित्या जागत्या माणसांना या नरकात विनाकारण उतरावे लागणार नाही.आपल्या बेफिकिरीमुळे आपण करीत असलेल्या घाणीमुळे काहींचे आयुष्य पणाला लागते ही जाणीव लज्जित करून गेली. ‘आरक्षण हटवा’ ही मागणी करताना दलितांसाठीच पिढ्यानपिढ्या असलेले हे आरक्षित काम कधी संपणार ??
‘कचराकोंडी’ फिल्म मधील अंगावर येणारी जयंती मकवाना यांची कविता आठवते
manholeचे झाकण उघडताना घुसत येणारा
सहस्त्र सडलेल्या सुंदर शवांचा सु –वास
सवलीच्या आईनं उपडं केलेलं मळाचं डबड
नी दूर नागडा फिरणारा माझ्या पिढीचा वारसदार
बस्स ‘हेच’ आमच्यासाठी ‘आरक्षण’ ??
National commission for safai workers च्या मते दर ५ दिवसांनी एका सफाई कामगाराचा कामाच्या
ठिकाणी मृत्यू होतो. ही आकडेवारी केवळ बातम्यांच्या आधारे आहे. संघटनेच्या मते ही संख्या कितीतरी
जास्त आहे
राष्ट्रीय ग्रामीण अभियानातील सर्वेक्षणनुसार १५ ते २५ वयोगटातील ३७ टक्के तर ३५ ते ४५ वयोगटातील
२३ टक्के सफाई कामगार मृत्यू पावतात त्यातील ९४ टक्के सफाई कामगार दलित आहेत
पत्रकार अमर शैला यांच्या अभ्यासानुसार या कामगारांना मलेरिया, टीबी, डेंग्यू, त्वचा आजार ,कावीळ
यासारखे आजार सतत होतात. पायाला जखमा होऊन इन्फेक्शन होण्याचे प्रमाणही मोठे आहे.
- हेरंब कुलकर्णी herambkulkarni1971@gmail.com
हा लेख सकाळ च्या सप्तरंग पुरवणीत प्रसिद्ध झाला आहे


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा